Mar 31, 2011

भाऊसाहेब थोरातांची नाराजी


हकार-राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्याचे तत्कालिन कृषिमंत्री व विद्यमान महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या प्रमुख उपस्थितीत काही दिवसांपूर्वी संगमनेरात कार्यक्रम झाला. त्याची बातमी वाचताना माझं मन मात्र साडेतीन-चार वर्षं मागं गेलं. पुण्यातल्या एका कार्यक्रमात मला भाऊसाहेबांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी विचारलेल्या काहीशा खोचक प्रश्नावर त्यांनी राज्याच्या कृषी खात्याची कामगिरी समाधानकारक नाही असा `घरचा अहेर` दिला होता. त्याची मी दिलेल्या, पहिल्या पानावर बायलाईनसकट छापून आलेल्या बातमीची आठवण ताजी झाली.

केंद्र सरकारने डॉ. एम. एस. स्वीमीनाथन यांच्या अध्यक्षेतेखाली `राष्ट्रीय शेतकरी आयोग` नेमला होता. या आयोगाच्या धोरणाच्या मसुद्यावर चर्चेसाठी वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यशाळेत भाग घेण्यासाठी भाऊसाहेब थोरात आले होते. त्यांच्या तडाखेबंद भाषणानंतर त्यांना मी गाठलं. भाऊसाहेबांचं एकूण व्यक्तिमत्त्व, सहकार-राजकारणातला दबदबा, आयुष्याच्या सुरूवातीच्या कालखंडात डाव्या विचारांशी जोडली गेलेली नाळ, खणखणीत आवाजात कोणाचीही भीड-भाड न ठेवता विचारांची स्पष्ट-सडेतोड मांडणी करण्याची शैली यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल कुतुहल होतंच पण त्याचबरोबर सत्ताधारी पक्षात असूनही आणि राज्याच्या कृषीमंत्रीपदाची जबाबदारी स्वतःच्या पुत्राकडे असतानाही एकूण शेती धोरण आणि कृषी खात्याबद्दलचा त्यांचा एकंदर रोख बघून माझ्यातला बातमीदार खूष झाला होता.

त्यांनी भाषणात मांडलेल्या मुद्यांना अनुसरून आमचं बोलणं सुरू झालं. ते एक-एक मुद्दा विस्तारानं सांगत होते. त्या मुद्यांच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या कृषी खात्याच्या कामगिरीबद्दल आपलं मत काय आहे, असा थेट सवाल मी त्यांना केला. त्यावर ते उत्तरले,"राज्याच्या कृषी खात्याच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी नाही. एकूणच संपूर्ण राज्यव्यवस्थेबद्दलच आपली नाराजी आहे." आपल्या या बॉम्बगोळ्याचा नेमका काय अर्थ लावला जाईल याची त्यांना पूर्ण कल्पना होती, असं त्यांच्या अविर्भावावरून जाणवत होतं. उत्तराचा विपर्यास केल्याचा संभाव्य आरोप टाळण्यासाठी मी खुंटा अधिक बळकट करत प्रश्न आणखी स्पष्ट केला. त्यावर माझ्या खांद्यावर थोपटत ते म्हणाले,"परिस्थिती समाधानकारक नाही. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी खूप खोलवर जाऊन उपाययोजना करावी लागेल. केवळ कृषी खातंच नाही तर सध्याच्या एकूणच संपूर्ण राज्यव्यवस्थेवर आपण नाखूष आहोत. यापेक्षा तुमच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर काय देऊ?" यातून तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा, असं मला कोपरानं ढोसत त्यांनी सांगितलं तेव्हा बिटविन दि लाईन्स बरंच काही ध्वनित झालं होतं.

त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही सडकून टीका केली. जोपर्यंत सरकार शेतमालाच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये भरघोस वाढ करत नाही, तोपर्यंत सहाव्या वेतन आयोगाची स्थापना करू नये, असंही त्यांनी ठासून सांगितलं होतं. ते म्हणाले होते, "१९७० साल हा केंद्रबिंदू मानून सरकारने अन्नधान्य, तेलबिया, कडधान्य, ऊस, कापूस इत्यादींसाठी किमान आधारभूत किंमती किती ठरवल्या व याच कालावधीत सरकारने आपल्या कर्मचा-यांच्या पगारात किती वाढ केली याचं गुणोत्तर काढून दोहोंची तुलना करावी. सरकारने सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे" संघटित क्षेत्रातील लोक सरकारला घेरून आपला फायदा पदरात पाडून घेतात, पण शेतक-यांच्या बाजूने मात्र कोणीच बोलत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शेतक-यांकडून मिळणा-या पैशाच्या जीवावर सगळ्यांची चंगळ चालू आहे व शेतक-यांवर मात्र अन्याय होतोय, असे ते म्हणाले. खासदारांच्या पगार-भत्ते वाढविण्याच्या संसदेच्या निर्णयावरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली.

राजकारणी लोक शहरी लोकांच्या मतांवर डोळा ठेऊन धोरण राबवित असल्याने शेतमालाच्या किंमती कमी ठेवत "सगळं चांगलं चाललंय" असं भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असं त्यांनी स्पष्ट केलं. गव्हाच्या आधारभूत किंमतीत दहा रूपयांची वाढ केल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, या गतीने गव्हाला किफायतशीर भाव मिळण्यासाठी शेतक-यांच्या दहा पिढ्या जाव्या लागतील.

त्यावेळी कृषी खाते आणि कृषी विद्यापीठे यांतील बदल्यांचा विषय जोरात चर्चेत होता. हल्ली मंत्र्यांकडे बदल्यांसाठी लोकांची रीघ लागलेली असते, बदल्या करणं हे काय मंत्र्यांचं काम आहे का, अशा शब्दांत त्यांनी कानउघडणी केली. राज्यातल्या चार कृषी विद्यापीठांचा प्रत्यक्ष शेतक-यांना काही उपयोग होतोय का असाही त्यांचा थेट सवाल होता. प्राध्यापक-शास्त्रज्ञांच्या पगार-नोकरीची सोय झाली; पण शेतक-यांचं काय, ही मंडळी शिक्षण-संशोधनापेक्षा आपली अमुक-तमुक ठिकाणी बदली करा, म्हणून मंत्र्यांच्या मागे लागलेले असतात, असा टोलाही त्यांनी मारला.

मी हा सगळा दारूगोळा वापरून बातमी फाईल केली. पहिल्या पानावर बातमी छापून आली आणि बरीच गाजली. अपेक्षेप्रमाणे कृषी खात्यात आणि विद्यापीठाच्या वर्तुळात मोठी खळबळ माजली. विद्यापीठातील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने तर मला फोन करून भाऊसाहेबांच्या वक्तव्याबद्दल नाराजीचं आख्यान लावलं होतं. पण बाळासाहेब थोरातांनी मात्र प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काही खुलासा करण्याचं टाळलं. भाऊसाहेबांची मतं खोडून टाकता येत नाहीत आणि त्यांच्या निरीक्षणाशी सहमतही होणं शक्य नाही, अशा खिंडीत ते अडकले होते. वरिष्ठ-अतिवरिष्ठ अधिका-यांमध्ये मात्र पुढचे अनेक दिवस या बातमीची खमंग चर्चा होत राहिली.

Mar 29, 2011

कम्युनिकेशन

खाद्या ब्राह्मण कुटुंबातल्या माणसांचं एकमेकांशी असणारं कम्युनिकेशन-संवाद आणि बहुजन समाजातल्या एखाद्या घरातलं कम्युनिकेशन यातला फरक... बहुजन समाजातल्याच पण शहरात राहणा-या नोकरदार कुटुंबातली संवादक्रिया आणि खेड्यात राहणा-या शेतकरी कुटुंबातली संवादक्रिया याची तुलना....मी कॉलेजमध्ये शिकायला असताना अनेक गोष्टींवर विचारांची चक्रं चालू असायची डोक्यात त्यातला हा एक आवडता विषय. नात्यांचे पीळ, गुंतागुंत, कुटुंबातला मोकळेपणा, संवादाची भाषा, शिक्षण, व्यवसाय-नोकरी, आर्थिक स्थिती, शिकणारी कितवी पिढी, राजकीय प्रक्रियेतलं स्थान आणि प्रभाव, भवताल, सभोवतीचं पर्यावरण, स्वतःला व्यक्त करण्याच्या पधद्ती आणि कौशल्यं, परंपरने दिलेलं भान आणि शहाणपण, जगण्याचं त्यांचं म्हणून एक तत्त्वज्ञान इत्यादी असंख्य मुद्दे जोखत या संवादप्रक्रियेचा थांग लावण्याचा कळत-नकळत प्रयत्न सुरू असायचा. अर्थात हे सगळं खूप विचारपूर्वक करत होतो असं नाही तर अनेक तुकड्या-तुकड्यांत विचार सुरू असायचा आणि त्यातून एखादा धागा सापडत जायचा.

खरं तर कॉलेज संपल्यानंतर पत्रकारितेत आल्यावरच मला सर्वसाधारण शेतकरी समाजाबद्दलचं नेटकं आकलन व्हायला सुरूवात झाली. शेतमालाला रास्त भाव न देण्याच्या आपल्या सरकारच्या धोरणामुळे शेतकरी समाज एक प्रकारच्या शोषणाच्या वरवंट्याखाली कसा भरडला जात आहे, याची धारदार जाणीव `शेतकरी संघटने`मुळे होत गेली. स्वातंत्र्योत्तर काळातलं एकूणच शेतीचं धोरण `भारता`तल्या शेती व शेतक-यांचं शोषण करून  `इंडिया`तल्या शहरी-मध्यमवर्ग-नवश्रींमंत-अतिश्रीमंत लोकसंख्येच्या हिताची काळजी वाहणारं आहे; कारखानदारीला स्वस्तात कच्चा माल मिळावा यासाठी शेतीमालाला उत्पादनखर्चाइतकाही रास्त भाव न देणं हा या धोरणाचाच भाग आहे, या संघटनेच्या एकूण मांडणीमुळे माझा पर्सपेक्टिव्ह खूपच बदलला. कॉलेजमध्ये असताना इकॉनॉमिक्सच्या एका अभ्यासाचा भाग म्हणून एखाद्या पिकाचा `कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स`निहाय संपूर्ण उत्पादनखर्च काढणे हा केवळ `एकेडेमिक एक्झरसाईज` होता. त्यात शेतक-याच्या श्रमाचे मूल्य लिहिताना त्याच्या शोषणाच्या मात्रेचाही तो एक आकडा आहे हे त्यावेळी मला कधी कळलंच नव्हतं. स्वतःचे श्रम खाऊन पोटापुरतं पिकत असल्याने शेतीच्या बेडीतून बाहेर न पडू शकणा-या शेतकरी समाजाबद्दलची जाणीव नंतरच्या काळातच थोडीफार स्पष्ट होत गेली.

स्वतःच्या शेतात गुरांबरोबर आणि एक प्रकारे गुरांसारखंच राबत असताना आणि या शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मार्गही समोर दिसत नसताना या शेतक-याची संवादाची कृती आणि प्रक्रिया कशी असेल, हा प्रश्न पुन्हा सतावू लागला. या शेतकरी कुटुंबातलं कम्युनिकेशन नेमकं कसं असतं, कामाच्या जोखडात-रगाड्यात बांधून घेतल्यावर स्वतःला व्यक्त करणं, मन मोकळं करणं त्यांना साधतं का, कम्युनिकेशन गॅपमुळे त्यांची कुचंबणा कशी होते, भावनांचे कढ निःशब्दपणेच व्यक्त होतात याकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा प्रयत्न करत होतो. जागतिकीकरणानंतर संपूर्ण भवतालाचं चित्रच पालटून गेलेलं असताना आणि तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे टीव्ही, मोबाईल इत्यादी साधनांचा सुळसुळाट झालेला असताना एकीकडे खेड्याबाहेरच्या जगातले समृध्दीघन बदल त्यांना रोजच दिसणं-अनुभवणं शक्य झालं आणि त्याचवेळी स्वतःच्या आय़ुष्यातल्या अभावग्रस्त, कोरड्या दिवसांचा हिशोब मांडत असताना या दोन्हीची ते सांगड कसे घालत असतील हा प्रश्न मला अस्वस्थ करून टाकतो. टीव्हीमुळं आख्खं जगच घरात आलेलं असताना टीव्हीच्या पडद्यावरील रंगी-बेरंगी प्रतिमांच्या माध्यमातून अंगावर येणारं शहरकेंद्रीत सुखलोलूप जगण्याचं चित्र पाहताना ते आपल्याला अप्राप्य आहे असं वाटून ते निराश होत असतील की त्या हलत्या प्रतिमांच्या जगाचा आपल्या आयुष्याशी सांधा कसा जुळत नाही ही जाणीव त्यांना आतल्या आत पोखरत असेल? टीव्हीच्या पडद्यावरचं जग आणि स्वतःच्या सभोवतीचं जग यातलं अंतर जाणवून त्याला ते कसे रिएक्ट होत असतात? शेतकरी कुटुंबातल्या पौगंडावस्थेतील मुलांचं भावविश्व बदलत्या काळाच्या पार्श्वभुमीवर नक्कीच उलटं-पालटं होत असणार. त्याची दखल कुठं घेतली जातेय का? शहरात शिक्षणाच्या निमित्तानं राहून आलेल्या पण तिथं नोकरीची संधी न मिळाल्याने परत गावाकडे येऊन शेतीला जुंपल्या गेलेल्या तरूण मुलांचा एक वेगळा वर्ग आहे आणि त्यांचे स्वतंत्र प्रश्न आहेत. त्यांना त्यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी, मनातल्या खळबळीचा निचरा करून देण्यासाठी खेड्यातल्या कम्युनिकिकेशनच्या सिस्टीमध्ये काही आऊटलेट आहे का, हा सुध्दा एक मोठाच मुद्दा आहे.

मोबाईल खेड्या-पाड्यांत पोहोचल्यामुळे तिथल्या लोकांचं एकमेकांशी असणारं कम्युनिकेशन प्रचंड वाढलं आहे असं मानणं मला खूपच वरवरचं आणि अपुरं वाटतं. मोबाईल हे कम्युनिकेशनचं एक साधन आहे; पण ते साधन आणि संवादाची प्रक्रिया या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. शेतक-याचं बाहेरच्या लोकांशी बोलणं वाढलं असेल कदाचित मोबाईलमुळे पण त्याचा कुटुंबातल्या लोकांशी संवाद वाढलाय याबद्दल मला तरी शंका वाटते. कारण संवाद ही प्रक्रिया केवळ साधनापुरती मर्यादित नाही. संवाद या संकल्पनेचा अवकाश खूप मोठा आणि व्यापक आहे. शेतकरी सध्या काय प्रकारचं आयुष्य जगतोय, त्या जगण्याच्या प्रेरणा, त्यातले ताण, विळखे, हर्ष-आनंद याचं शेअरिंग घरच्या लोकांबरोबर करता येईल असं काही पर्यावरण समाजव्यवस्थेत सध्या आहे का, हा खरा मुद्दा आहे. शेतीला किफायतशीर धंदा न बनू देण्याची व्यवस्था करून शेतक-याचं सुख, स्वस्थता, स्वास्थ्य आणि उसंत आपण हिरावून घेतलीय आणि त्यामुळे त्यांच्या कम्युनिकेशनमधला प्राणही आपण काढून घेतलाय हे वास्तव आपल्याला नाकारता येईल का?

`बापाचे कम्युनिकेशन` या कवितेत बालाजी इंगळे हा कवी म्हणतोः

वावरात कुळवत असणा-या
बापाच्या डोक्यावर पसरलेलं असतं
असंख्य मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कचं जाळं
बाप मात्र कामाच्या धबडग्यात
बाजूच्याच तुकड्यात खुरपणा-या आईला
दिवस दिवस बोलू शकत नाही  

Mar 28, 2011

शहरी जाणीवाः एक आकलन

शेतक-यांच्या जगण्याकडे पाहण्याची सर्वसाधारण शहरी जाणीव कशी असते हा माझा नेहमीच कुतुहलाचा, औत्सुक्याचा आणि बहुतांश वेळा चीड आणणारा विषय राहिला आहे. एक तर शेतक-यांना दिले जाणारे पॅकेजेस, कर्जमाफी वगैरेंकडे उपकाराच्या भावनेतून पाहत एवढं सगळं दिलं तरी यांची स्थिती काही सुधारत नाही, सगळं फुकटात लाटतायत अशी एक अज्ञानातून आलेली मूर्ख प्रतिक्रिया सर्रास आढळून येते. दुसरा एक वर्ग असा असतो की त्यांना सतत असं वाटतं की एका दाण्यातून हजार दाणे करण्याची क्षमता असणारा शेतीचा उद्योग तोट्यात जातोच कसा, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नाहीत, त्यामुळे त्यांची शेती आतबट्ट्याची होते, हा त्यांचा लाडका सिध्दांत असतो. या लोकांना शेतीच्या बाजारभावाचं गणित माहित नसतं की कारखानदारीला कच्चा माल स्वस्तात मिळावा यासाठी शेती तोट्यातच राहायला पाहिजे हे सरकारनंच स्वीकारलेलं धोरण आहे, याचीही सुतराम कल्पना नसते. शेतक-यांकडे नेहमी दयाबुध्दीने आणि करूणेने पाहणारा आणखी एक वर्ग असतो. सिग्नलवर भीक मागणा-या लहान मुलांकडे पाहण्याचाही त्यांचा तोच दृष्टिकोन असतो. खरं तर स्वतःची मुळं हरवून बसलेल्या, कायम एक गिल्ट घेऊन जगणा-या महानुभवांची ती वांझोटी आणि अवास्तव कणव असते.
खेड्यातल्या लोकांच्या जगण्याची धग, आयुष्यातले ताण, पीळ आणि ताणे-बाणे याचं नीट आकलन होण्यासाठी एक स्वच्छ दृष्टी आणि मोकळं-संवेदनशील मन असलं पाहिजे. याचा अर्थ खेड्यात सगळे साधु-संतच राहतात असा मुळीच नाही. (शहरातल्या काही लोकांचाच तोही एक गैरसमज.) जीवनातल्या सगळ्या प्रकारच्या प्रवृत्तींचं दर्शन तिथंही होतंच. तिथंही बेरकी, दुष्ट, खलप्रवृत्तीची, क्रूर इत्यादी लोकं असतातच. तो वेगळा विषय आहे. पण मुळात डोळ्यांवर झापडं बांधूनच शहरी जाणीव खेड्याकडे बघते आणि आपल्याला बघायला जे आवडेल तेच तिकडं शोधते, हा माझा मुद्दा आहे.  सर्वसाधारणपणे या शहरी जाणीवेचा लसावि काढला तर शेती आणि खेडी यांच्याबद्दलचा एक रोमॅन्टिसिझम त्यांच्या मनात किती खोलवर नांदतोय याची प्रचीती येते. खेड्यामधले घर कौलारू.... माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी वाहतं.... असं जे चित्र त्यांच्या मनात असतं ते मला एकंदर कचकडयाचं आणि बेंगरूळ वाटतं. कधीतरी विकेंडला पिकनिक म्हणून शेतात जाणं वेगळं आणि खेड्यात राहून शेतकरी म्हणून शेती करणं वेगळं यातला भेद त्यांच्या लक्षात येत नाही हे त्यांचं अज्ञान मानायचं, आकलनाची मर्यादा म्हणायची की दांभिकपणा हा प्रश्न मला पडतो. शेतात डोलणारं भरगच्च पीक बघितलं की शहरी लोकं हरखून जातात आणि त्यांना एक प्रकारचा जो रोमॅन्टिक आनंद होतो, तसा प्रत्यक्ष शेतक-याला होत नाही. कारण या पिकाची बाजारात काय वासलात लागणार, काय भाव मिळणार ही काळजी त्याला खात असते.

शेतीधंदा आतबट्ट्याचा का होतो, शेतक-यांना उत्पादनखर्चाइतकाही रास्त भाव का दिला जात नाही याचं मूलगामी अर्थशास्त्रीय निदान करताना `शेतकरी संघटने`च्या शरद जोशींनी `भारत` आणि `इंडिया` अशी मांडणी केली आहे. `इंडिया`तल्या लोकांना समृध्द जीवन देण्यासाठी `भारता`तल्या शेतक-यांचं आर्थिक शोषण केलं जातं आहे हे त्यांनी ठामपणे मांडलं. शेतीकडे बघण्याच्या शहरी जाणीवेचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा शरद जोशींची ही मांडणी मला एक खूप मोठा पट उलगडून सांगत असते.

एकूण शेतकरी, खेडं यांच्याकडे बघण्याचा शहरी दृष्टिकोन असा अडाणचोटपणाचा असल्याने ग्रामीण भागात जी स्थित्यंतरं होत आहेत, होऊ घातली आहेत, त्याकडेही बघण्याची शहरी नजर अशीच कातावून टाकणारी असते. एकाच वेळी तिची गंमतही वाटते आणि ती आक्षेपार्हही वाटते. बरं जी माणसं शहरातच जन्मली, वाढली त्यांची ही त-हा एकवेळ समजून घेता येईल पण ज्यांची नाळ खेड्याशी जोडलेली आहे, तिथून नोकरी-धंद्याच्या निमित्तानं जी लोकं शहरात स्थाईक झाली किमान त्यांच्या जाणीवेला तरी संवेदनांचा पदर असावा की नाही? ती लोकं पण फालतू नॉस्टेलजियाला आळवत आमच्या लहानपणी अमुक होतं आणि आता मात्र तमूक झालं अशी `कृष्णाकाठी कुंडल आता पहिलं उरलं नाही` छापाचे गळे काढत असतात, त्याचा अक्षरशः वीट येतो. खेड्यांमधल्या स्थित्यंतराचा नेमका अवकाश काय आहे, त्या अपरिहार्यतेमागची कारणं काय आहेत, त्यांना सामोरं जाताना ग्रामीण समाजमनाची स्थिती कशी आहे, तंत्रज्ञानाच्या वारूवर स्वार झालेल्या वेगाने बदलणा-या भवतालाला ते कसा प्रतिसाद देतायत, त्यातून काय सकारात्मक आणि नकारात्मकही बदल घडून येतायत, नव्या चौकटीत मूल्यव्यवस्थेची भाषा आणि रचना बदलतेय का..... असे असंख्य प्रश्न का पडत नाहीत आपल्याला?

`धूळपेरणी ` आणि `असं जगणं तोलाचं ` या पुस्तकांचे लेखक आणि शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते प्रा. शेषराव मोहिते यांनी एका ठिकाणी खूप मार्मिक लिहिलं आहे, ते मला या संदर्भात विचार करताना महत्त्वाचं वाटतं त्यामुळे येथे उध्दृत करतो. मोहिते लिहितातः ``(खेड्यात होणा-या) या बदलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असायचा? `जुनं ते सोनं` असाच. जेव्हा विहिरीवरली मोट गेली आणि इंजिन आले, तेव्हा मोटेवरली गाणी गेली म्हणून आपण किती विव्हळलो! अनेक कथा-कादंब-यातून ते उसासे उमटले. पण जेव्हा मोट होती तेव्हा बैलाचे काय हाल होते. शिवळ खांद्यात रूतून सतत बैलाचे खांदे फुटायचे, त्यातून रक्त गळायचे, मांस बाहेर यायचे, कावळे चोच मारून बैलाचा जीव नकोसा करायचे, डोळे गच्च मिटून त्या वेदना सहन करताना त्या बैलांकडे शेतकरी उघड्या डोळयांनी पाहू शकत नसत. तरीही आमच्या साहित्यिकांना दुःख कशाचे तर ते मोटेवरले गाणे आता ऐकायला मिळत नाही याचे. हेच जात्यावरल्या ओव्यांविषयी. पहाटे तीन-चार वाजता उठून जाते ओढताना पोटातील आतडे गोळा झाले म्हणजे आया-बाया ती वेदना विसरण्यासाठी गाणी म्हणत. पिठाची गिरणी आली आणि या हजारो वर्षाच्या जाचातून स्त्री सुटली, पण आपणास दुःख ते ओवी हरविल्याचे.

मळ्यात इंजिन जेव्हा येते तेव्हा ते स्वतःचे एक भावविश्व घेऊन येते. पिठाची गिरणी आली आणि तिच्या आवाजाने खेड्याचा आसमंत एका वेगळ्या लयीने, आवाजाने भरून गेला, तिकडे आपण पाहत नाही. काय आले त्याचे नीट कौतुक होत नाही आणि काय गेले त्यासंबंधी मात्र चुकीच्या पध्दतीने उमाळे दाटून येणं हे फारसं शहाणपणाचं लक्षण नाही. प्रामाणिकपणाचेही लक्षण नाही.``

हे भाष्य पुरेसे बोलकं आहे, नाही का?

Mar 24, 2011

पॅकेजचा घोटाळाः मूळ मुद्याकडे डोळेझाक

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीतला घोटाळा आणि त्याअनुषंगाने तब्बल 405 कर्मचारी-अधिका-यांवर कृषी खात्याने केलेली कारवाई हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असे याचे वर्णन करून जणू काही आपण खूप मोठा तीर मारला आहे असे भासवण्याचा प्रयत्न सध्या सरकारच्या गोटातून सुरू आहे. या दाव्याची सत्यासत्यता नीट तपासून पाहिली पाहिजे.

मुळात सरकारने किंवा कृषी विभागाने स्वतःहून हा घोटाळा उघडकीला आणण्यासाठी काहीही हालचाल केलेली नव्हती. माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलेल्या प्रश्नामुळे या पॅकेजच्या अंमलबजावणीतलं पितळ उघडं पडलं, ही बाब उल्लेखनीय आहे. शिवाय कॅगने (CAG) या पॅकेजच्या एकूणच अंमलबजावणीतला सावळा गोंधळ पुराव्यानिशी उघड करत गंभीर स्वरूपाचे ताशेरे ओढले. त्या व्यतिरिक्त राज्य विधिमंडळाच्या लोकलेखा समितीनेही या पॅकेजमधल्या अनेक भानगडी वेशीवर टांगल्या. या संपूर्ण घटनाक्रमात पॅकेज महासंचालकांचे कार्यालय किंवा कृषी विभाग यांना काहीही श्रेय देता येत नाही.

कॅगच्या अहवालानंतर या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आणि पंतप्रधान कार्यालयाकडूनही चौकशीचं सत्र सुरू झालं. त्यानंतर कुठेतरी चक्रं फिरली आणि सरकारने पॅकेजचे तत्कालिन महासंचालक डॉ. बी. व्ही. गोपाळ रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. वास्तविक या समितीची कार्यकक्षा मर्यादित होती. सीएम आणि पीएम पॅकेजसाठीची एकूण रक्कम सुमारे पाच हजार कोटीं रूपयांच्या घरात जाते. त्यातल्या सीएम पॅकेजच्या एकूण 1075 कोटी रूपयांमधल्या, 60 हजार शेतक-यांना प्रत्येकी 25 हजार रूपयांची आर्थिक मदत देणे, एवढ्याच प्रकरणात झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी या समितीकडे होती. वास्तविक महाघोटाळ्यातला हा एक लहान भाग आहे. त्याची चौकशी डॉ. रेड्डी यांनी केली आणि 405 कर्मचारी-अधिका-यांवर ठपका ठेवला. त्यातही अधिका-यांपेक्षाही खालच्या स्तरावर काम करणा-या कर्मचा-यांची संख्या जास्त आहे. कर्मचा-यांनीच केवळ घोटाळा केला आणि त्यांच्यावर नियंत्रणाची जबाबदारी असणारे अधिकारी मात्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते, असं मानायचं का?

रेड्डी समितीने चौकशी केलेल्या प्रकरणाव्यतिरिक्त पॅकेजमध्ये झालेल्या बाकीच्या घोटाळ्यांचं काय? त्याबाबत सरकारची भूमिका काय आहे, याचा खुलासा अजूनही झालेला नाही. वास्तविक पॅकेजची अंमलबजावणी करणा-या कार्यालयाचे प्रमुख म्हणून डॉ. रेड्डी काम करत होते, त्यांनी आपल्याच विभागाच्या कर्मचा-यांची केलेली खात्यांतर्गत चौकशी असे या समितीचे स्वरूप होते. या पार्श्वभुमीवर कॅग आणि लोकलेखा समिती या तटस्थ आणि वैधानिक अधिष्ठान असलेल्या यंत्रणांमार्फत झालेली चौकशी आणि त्यांनी ओढलेले ताशेरे यांचे महत्त्व अधिक आहे. पण त्यांचा अहवाल गांभीर्याने स्वीकारायचा तर अनेक बड्या धेंडांवर कारवाईचा बडगा उगारावा लागेल आणि त्यांना अंगावर घेण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारकडे नाही, त्यामुळे रेड्डी समितीने दिलेल्या अहवालानुसार छोट्या माशांवर कारवाई करून देशातील सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई केल्याचा ढोल बडवत रंगसफेदी करायची असं एकूण सरकारचं धोरण दिसतं आहे. याविषयी कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्पष्टीकरण का देत नाहीत?  

पॅकजचा घोटाळा हा फक्त 60 हजार शेतक-यांना निकृष्ट दर्जाची शेतीउपयोगी साधनांचा पुरवठा एवढ्यापुरताच मर्यादित नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे. त्या व्यतिरिक्त जो काही महाघोटाळा झालेला आहे त्याची सविस्तर चौकशी करून कॅगने जो अहवाल दिलेला आहे, त्याच्यावर कृषीमंत्री मूग गिळून गप्प का आहेत? लोकलेखा समितीच्या अहवालात अनेक वरिष्ठ, अतिवरिष्ठ अधिकारी आणि पुढा-यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. त्यांना अजून हात का लावण्यात आलेला नाही? या पॅकेजच्या अंमलबजावणीच्या घोटाळ्यात तत्कालिन कृषिमंत्री, कृषी सचिव आणि आयुक्त यांची नेमकी भूमिका काय राहिली आहे, याचा खुलासा व्हायला हवा. रेड्डी समितीने तीन वर्षांपूर्वी अहवाल देऊनही तत्कालिन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समितीच्या अहवालानुसार निलंबनाची कारवाई करायला चालढकल केली. त्यामुळे त्यांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद वाटते.

या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पॅकेजच्या महाघोटाळ्यात गुंतलेल्या सगळ्याच बड्या माशांविरूध्द कारवाई करायची हिंमत राधाकृष्ण विखे पाटलांनी दाखवावी. तसेच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केवळ रेड्डी समितीचाही विचार केला तर ठपका ठेवलेल्या 405 महाभागांनी शेतक-यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारला आहे, हे स्पष्टच आहे. मग त्यांच्यावर अजून पर्यंत फौजदारी कारवाई करण्याची प्रक्रिया का सुरू करण्यात आलेली नाही, हे ही संशय वाढविणारे आहे. थातुर-मातूर कारवाईचा फार्स करायचा पण दोषींच्या गळ्याला तात लागणार नाही, याचीही दक्षता घ्यायची, असं तर गौडबंगाल या कारवाईमागे नाही ना, अशा शंकेला वाव आहे.

जाता जाताः काल आम्ही या ब्लॉगवर सकाळी लिहंलं होतं की इलेक्ट्रॉनिक मिडियाला या प्रश्नाचं गांभीर्य जाणवलं नाही. पण काल रात्री आयबीएन लोकमतने `आजचा सवाल` या कार्यक्रमात या विषयावर चांगली चर्चा घडवून सुखद धक्का दिला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन.

कबीर माणूसमारे  

Mar 23, 2011

निलंबन झाले, पुढे काय.....?

विदर्भातील सहा जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीत गैरव्यवहार करणा-या 405 अधिकारी-कर्मचा-यांचे निलंबन आणि खात्यांतर्गत कारवाई करण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच विधानसभेत केली. पीएम पॅकेज 3750 कोटींचं तर सीएम पॅकेज 1075 कोटी रूपयांचं होतं. मुख्यमंत्री पॅकेजमधून एकूण 60 हजार शेतक-यांना प्रत्येकी 25 हजार रूपयांची आर्थिक मदत देणे अपेक्षित होते. पण शेतक-यांना थेट आर्थिक मदत देण्याऐवजी त्यांना गरजेनुसार कृषी साहित्याची मदत देण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला आणि हीच या प्रकरणातल्या गैरव्यवहारांची नांदी ठरली. शेतक-यांना पॅकेजमधून देण्यात आलेल्या बैलगाड्या, बैलजोड्या, ताडपत्री, पाईप, स्प्रे पंप, डिझेल इंजिन, खत, गांडूळ खत हे सारे साहित्य निकृष्ट दर्जाचे पुरविण्यात आले आणि पैसे लाटण्यात आले असे या घोटाळ्याचे स्वरूप आहे. नियम-निकष धुडकावून कृषी विभागातील अधिकारी-कर्मचा-यांनी आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांशी साटेलोटे करत पॅकेजवर डल्ला मारला.

कृषी साहित्य किंवा निविष्ठांचा थेट शेतक-यांना पुरवठा करण्याचं धोरण आखून चरायला कुरण मिळवायचं हे कृषी खात्यातलं जुनं दुखणं आहे. शेतक-यांना जैविक निविष्ठांचा पुरवठा करण्याच्या बाबतीतही हीच मोडस ऑपरेंडी राबविण्यात येत होती. शास्त्रीय निकषांकडे कानाडोळा करत खास मर्जीतल्या पुरवठादारांकडून परिणामशून्य निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची खरेदी करून ती शेतक-यांच्या माथी मारायची; तसेच काही ठिकाणी तर केवळ कागदावर पुरवठा दाखवायचा असे प्रकार करून आपली घरं भरायचा उद्योग अनेक जिल्ह्यांत सुरू होता.

शेतक-यांच्या आत्महत्यांच्या संवेदनशील प्रश्नावरही आपली सरकारी यंत्रणा प्रेताच्या टाळुवरचं लोणी खाण्याच्या मनोवृत्तीनंच काम करते, याचा धक्का बसणं भाबडेपणांचं वाटावं इतकी ही व्यवस्था- सिस्टीम `अमानुष ` झाली आहे. ` पीपली लाईव्ह ` या चित्रपटात सरकारी बाबुशाहीचं जे चित्रण करण्यात आलं आहे ते कणभरही अतिशयोक्त वाटू नये अशा प्रकारची नियत आणि कारभार कृषी खात्याचा आहे, हे या पॅकेजच्या गैरव्यवहारातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आमच्या अखत्यारित येत नाही... ते अमुक-अमुक ब्रॅंचचं काम आहे.... अशी टोलवाटोलवीची पत्रापत्री कृषी खात्याच्या विस्तार विभागाच्याच दोन अधिका-यांमध्ये काही वर्षांपूर्वी सुरू होती, त्याचा प्रस्तुत बातमीदार साक्षीदार आहे. एकूणच कृषी विभागाचा आत्महत्यांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती संवेदनशील(!) आहे, याची ही शितावरून भाताची परीक्षा ठरेल.

पॅकेजच्या अंमलबजावणीत इतक्या व्यापक प्रमाणात भ्रष्टाचार होतो, हे विदर्भामध्ये एकूणच राजकीय व्यवहार आणि विकासाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे यावरचंही एक प्रकारचं भाष्य आहे. राजकारण्यांच्या सक्रीय सहभागाशिवाय इतका मोठा गैरव्यवहार होणं शक्यच नाही. त्यामुळे कृषी खात्याच्या कर्मचा-यांइतकाच नव्हे तर त्यांच्याहून अधिक दोष राजकारण्यांच्या पदरात जातो. विदर्भातील राजकारण्यांची ही ह्स्वदृष्टी आणि राजकारणी व सरकारी अधिकारी यांची भ्रष्ट युती हेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारांचं मूळ आहे. तळं राखील तो पाणी चाखील हे समर्थनीय नसलं तरी एक वेळ समजून घेता येण्यासारखं आहे, पण अख्खं तळंच घशात घालायचं हा प्रकार मात्र अश्लाघ्य आणि आपण सामान्य जनतेला अजिबात उत्तरदायी नाही, या उद्दाम मनोवृत्तीची साक्ष देणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात असं तळंच्या तळं रिचवता येत नाही, पण ते विदर्भ-मराठवड्यात का शक्य होतं, याचाही विचार व्हायला हवा.


कृषिमंत्र्यांनी पॅकेजच्या अंमलबजावणीत गैरव्यवहार झाला याची कबुली देत निलंबनाची घोषणा केली, याचं वर्णन काहीजणांनी धाडसी कारवाई असं केलं. पण पॅकेजच्या महासंचालकपदाची जबाबदारी सांभाळलेल्या बी. व्ही. गोपाळ रेड्डी यांनी या प्रकरणांची चौकशी करून आपला अहवाल दिल्यानंतर व कृषी विभागानेही अंतर्गत चोकशी करून त्याचा अहवाल मिळाल्यानंतर सरकार तीन वर्षे या प्रकरणावर नुसतं बसून होतं, हे चीड आणणारं आहे. विधानसभेत विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडल्यावर कृषिमंत्र्यांना निर्णय जाहीर करावा लागला हे विसरून चालणार नाही.

मुळात अधिकारी-कर्मचा-यांकडून पॅकेजला चुना लावत हा गैरव्यवहार सुरू असताना तो कोणाच्याच लक्षात आला नाही का, हा एक गंभीर प्रश्न आहे. त्यावरून या पॅकजेची अंमलबजावणी किती ढिसाळ पध्दतीनं चालू आहे यावर प्रकाश पडतो. केंद्र आणि राज्य सरकारकडून पॅकेजच्या माध्यमातून हजारो कोटी रूपये खर्च करूनही शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, हे या पॅकेजचं अपयश बोलकं आहे. पॅकेज राबविण्यासाठी महासंचालकांचं कार्यालय सुरू कऱण्यात आलं. तिथं महासंचालक म्हणून यायला कोणी आय.ए.एस. अधिकारी सहजासहजी राजी होत नाही. मारून-मुटकून कोणाला घोड्यावर बसवलं तर तो काही दिवसांत बदली करून घेऊन निघून जातो आणि तिथं कायम संगीतखुर्चीचा खेळ चालू राहतो. पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी या महासंचालकांच्या अखत्यारित यंत्रणा आहे ती कृषी आणि तत्सम विभागांच्या अधिकारी-कर्मचा-यांची. या विभागातील लोकांनी काम नीट केलं नाही तर त्यांचे गोपनीय अहवाल खराब करण्याचे अधिकार पॅकेजच्या महासंचालकांना नाहीत, त्यामुळे त्यांना ही यंत्रणा जुमानत नाही, असं गोपाळ रेड्डी यांनीच एकदा प्रस्तुत बातमीदाराजवळ बोलून दाखवलं होतं. पॅकेजचा कारभार कसा चालतो यावर यापेक्षा वेगळं भाष्य ते काय करणार?  

निलंबनाच्या कारवाईनंतर या प्रकरणाचा धुराळा खाली बसेल आणि परत सगळं पूर्वीसारखं चालू राहील, अशी रास्त भीती वाटते आहे. दोषी लोकांकडून अपहार झालेला पैसा कसा वसूल करणार आणि पुरवठादार आणि राजकारण्यांवर कोणती कारवाई होणार हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. एकूण 50 जणांचं थेट निलंबन आणि बाकीच्यांवर खात्याअंतर्गत कारवाई असं या निर्णयाचं स्वरूप आहे. निलंबनाचा निर्णय घ्यायला तीन वर्षे लागली आता त्यांची बडतर्फी कधी होणार आणि खात्यांतर्गत कारवाई शेवटपर्यंत तडीला जाणार का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. या प्रकरणात आधी निलंबित कऱण्यात आलेल्या धुरंधर नावाच्या कर्मचा-याला पुन्हा सेवत रूजू करून घेण्यात आल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. कृषी खात्याची नियत जर अशी असेल तर मग या कारवाईचा तार्किक शेवट करण्याची इच्छाशक्ती राधाकृष्ण विखे पाटील दाखवणार का, याचं उत्तर शोधावं लागेल. शिवाय अशी वरवरची कारवाई करण्याबरोबरच असे प्रकार घडू नयेत यासाठी भ्रष्टाचाराची सिस्टीम उखडून काढण्याची हिंमत विखे पाटील दाखवणार आहेत का? अन्यथा वरपासून खालपर्यंतची अधिका-यांची साखळी मॅनेज केली आणि एक मर्यादा ठरवून भ्रष्टाचार केला तर ते खाल्लेले पैसे पचवता येतात, हे कृषी खात्याला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्यामुळे वरवरचे पापुद्रे काढत धाडसीपणासाठी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची की निर-निराळ्या पातळ्यांवरचे हितसंबंध मोडून काढत सिस्टिम मुळापासून उखडून टाकण्याची जिगर दाखवायची यापैकी कोणता पर्याय विखे पाटील निवडतात यावरून त्यांच्या कृतीचा अर्थ, अन्वयार्थ आणि परिणाम स्पष्ट होईल. तोपर्यंत महानोरांच्या कवितेतली सूर्यनारायणा नित नेमानं उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा- इतकीच प्रार्थना आपण करू शकतो.

ताजा कलमः पॅकेजचा गैरव्यवहार आणि निलंबनाचा निर्णय हा मुद्दा इलेक्ट्रॉनिक मिडियाने फारसा उचलून धरला नाही. केवळ बातमीत भागविण्यात आलं. एरवी सुपर मून, अरूणा शानभागचं दयामरण यासारख्या मुद्यांवर कंठशोषी चर्चा करणा-या न्यूज चॅनेलना रोजच मरण अनुभवणा-या शेतक-यांच्या प्रश्नाला फारसं महत्त्व द्यावं वाटलं नाही, हे त्यांचं अज्ञान मानावं की ` इंडिया` ची  `भारता `च्या प्रश्नांकडे पाहण्याची मानसिकता समजावी?

कबीर माणूसमारे

Mar 21, 2011

एग्रिकॉस, शेती आणि कुलगुरू



काही वर्षांपूर्वी राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंबरोबर गप्पा मारत बसलो असताना आणखी काही पत्रकार तिथं आले. त्यातल्या एकानं खवचटपणे कुलगुरूंना विचारलं की कृषी विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांमध्ये शेती करणा-यांचं प्रमाण किती असतं? शेतीसाठी विद्यापीठ काढलेलं असताना त्या विद्यापीठाचे विद्यार्थी मात्र परत शेतीमध्ये जायला उत्सुक नसतात, हा मुद्दा त्यानं लावून धरला होता. त्यावर कुलगुरूंनी शेतीमध्ये उत्तम करियर करणा-या एग्रिकॉसची नावं फटाफट सांगितली खरी, पण शेतीकडे वळणा-या विद्यार्थ्यांचं एकूण प्रमाण तुलनेनं कमीच असल्याचंही त्यांनी कबूल केलं. अर्थात त्यामागची आर्थिक-समाजिक कारणं स्पष्ट करायला ते विसरले नाहीत.

खरं तर एग्रिकॉसनी परत शेतीकडेच वळलं पाहिजे अशी सरसकट अपेक्षा बाळगणं हेच मुळात मला केवळ चुकीचंच नव्हे तर अन्यायकारकही वाटतं. वास्तवाचं भान सुटलं की पुस्तकी पांडित्याचा आव आणत अशा अपेक्षा आणि दुराग्रही भूमिका मांडल्या जातात. एग्रिकॉसनी कशासाठी शेतीकडं परत वळावं? आत्ता शेती करत असणा-या समुदायाची स्थिती काय आहे? दुसरा एखादा पर्याय मिळाला तर शेतीव्यवसाय सोडून देण्याची इच्छा असणा-या शेतक-यांची संख्या लक्षणीय आहे. मुळात शेती हे केवळ एक Academic Science नाहीयै तर तो एक धंदा-व्यवसाय आहे. धंद्याची सगळी गणितं त्याला लागू पडतात. हा धंदा यशस्वी करायचा तर केवळ तांत्रिक ज्ञान पुरं पडत नाही तर त्याला व्यवस्थापनाची (मॅनेजमेंट) कौशल्यं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे भांडवली क्षमता लागते. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत तरी शेतीचा धंदा हा मुळीच फायद्याचा आणि परवडणारा नाही या वास्तवाची धगधगती जाणीव बहुतांश एग्रिकॉसना आहे.

शेतक-यांना शेती परवडत नसेल तर त्यांनी त्याच्या जोडीला एखादा जोडधंदा करावा असा सल्ला शहाजोगपणे दिला जातो. शेतक-याला जोडधंद्याची दृष्टी नसते, तो आळशी असतो असा ग्रह करून या विषयावर शेतक-यांना झोडपण्यात शहरी विद्वान आघाडीवर असतात. शेतक-यांना जोडधंदा करण्याचा सल्ला म्हणजे, निव्वळ शेती करणं हा धंदा आतबट्टयाचा आहे, हे सरळ-सरळ मान्य करणं आहे. अन्यथा कोणी डॉक्टरला डुकरं पाळायला सांगत नाही की इंजिनियरला कोंबड्या पाळायचा सल्ला देत नाही. फक्त शेतक-यांनाच शेतीच्या जोडीला एखादा धंदा करा असा सल्ला का दिला जातो? निव्वळ शेतीधंद्यामधून खर्चपरतावा व नफ्याचे गणित सुटत नाही, याची ही एक प्रकारे कबुलीच आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातलं एकूणच शेतीचं धोरण `भारता`तल्या शेती व शेतक-यांचं शोषण करून  `इंडिया`तल्या शहरी-मध्यमवर्ग-नवश्रींमंत-अतिश्रीमंत लोकसंख्येच्या हिताची काळजी वाहणारं आहे; कारखानदारीला स्वस्तात कच्चा माल मिळावा यासाठी शेतीमालाला उत्पादनखर्चाइतकाही रास्त भाव न देणं हा या धोरणाचाच भाग आहे, अशी जी `शेतकरी संघटने`ची एकूण मांडणी आहे ती या संदर्भात समजून घेतली पाहिजे. पिकाचा उत्पादनखर्च 40 टक्के कमी धरून सरकारी पातळीवर शेतमालाच्या वैधानिक किमान किंमती (एसएमपी) निश्चित केल्या जातात, हे साखर संकुलमध्ये झालेल्या एका बैठकीत तत्कालिन कृषी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांनी मान्य केलं होतं. भारतात शेतक-यांना `उणे 73` सबसिडी दिली जात असल्याचं भारत सरकारनं जागतिक व्यापार संघटनेपुढं सांगितलं आहे, हे शरद जोशींनी या आधीच सांगोपांग उघड केलेलंच आहे. (याचा अर्थ शेतक-याने 100 रूपयांचा माल पिकवला तर त्याच्या हातात प्रत्यक्षात 27 रूपयेच दिले जातात म्हणजेच उणे सबसिडी दिली जाते.) अशा धोरणामुळे उत्पादक-उपभोक्ता यांच्यातील संतुलन बिघडून देशाच्या विकासावर परिणाम तर होतच आहे, पण शेतक-यांची उत्पादनवाढीची प्रेरणा नष्ट होण्यात व शेती करण्याविषयी नावड निर्माण होण्यात त्याची थेट परिणिती झाली आहे, हे काही अर्थतज्ज्ञांचं मत नजरेआड करता येणार नाही.

खुली अर्थव्यवस्था-जागतिकीकरण याचा मोठा गाजावाजा झाला आणि होतही आहे; पण त्यातून शेतक-यांच्या पदरात नेमकं काय पडलं, त्यातून शेतक-यांचं काही भलं झालं की बिगर-शेतकरी वर्गाच्या वाट्यालाच मानाचं पान आलं याचं एकदा नीट ऑडिट मांडलं पाहिजे. शेतमालाच्या भावातली चलाखी आणि एकूणच धोरणात्मक पातळीवर झालेली नाडवणूक लक्षात घेता शेतक-यांवर असलेली कर्जेही अनैतिक आणि बेकायदेशीर आहेत, अशी भूमिका शेतकरी संघटनेने न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेत मांडली आहे. शेतक-यांना लुटण्याची एक पध्दतशीर व्यवस्थाच आपल्या समाजात नीटपणे कार्यरत आहे. त्यामुळेच भरपूर पीक आलं की शेतकरी सोडून सगळे सुखी होतात; मात्र दुष्काळ पडला, की फक्त शेतक-यांनाच खडी फोडायला जावं लागतं, असं पत्रकार-लेखक विनय हर्डीकर यांनी `विठोबाच्या आंगी`मध्ये जे साक्षेपानं लिहिलंय त्यात काहीच चूक नाही. हे वास्तव लहानपणापासून अनुभवत असलेल्या एग्रिकॉसनी शेतीत उतरावे अशी अपेक्षा कशाच्या बळावर बाळगावी, याचं समाधानकारक उत्तर मिळत नाही.

आपल्या समाजात श्रम-कृषीसंस्कृती दुय्यम स्थानावर ढकलली जाऊन सेवाक्षेत्राचं महत्त्व अतोनात वाढलं आहे. या स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर समृध्दीची आस लागलेली एक पिढी अभावग्रस्त जगण्याचं प्रतीक असलेल्या शेतीचा शक्यतोवर त्याग करून दुस-या क्षेत्रात पाय रोवू पाहत आहे, हा मुद्दाही दुर्लक्षून चालणार नाही. पण आपल्या डोळ्यांवरची झापडं काढून टाकल्याशिवाय हे वास्तव स्वच्छपणे दिसणार नाही. 

बहुतांश एग्रिकॉस हे कोरडवाहू क्षेत्रातले, अल्पभूधारक व अभावग्रस्त-गरीब परिस्थितीशी झगडत कॉलेजपर्यंत आलेले असतात. त्यांनी शिकून नोकरी-धंदा करावा व आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावं, अशी घरच्यांची अपेक्षा असते. शेतीत-मातीत हाडाची काडं झालेल्या घरच्या लोकांचे डोळे त्याकडेच लागलेले असतात. शेतीतून चांगले पैसे मिळवायचे असतील, तर सिंचनाची सुविधा आणि भांडवली गुंतवणुकीची क्षमता असणं आवश्यक असतं. त्याची बहुतांश ठिकाणी वाणवाच आहे. पाण्याशिवाय शेती करायची म्हणजे कितीही एकर जमीन असली तरी शेतमजुरापेक्षा मालकाच्या हातात कमीच पैसे पडतात, अशी बहुतेक ठिकाणी परिस्थिती आहे. त्यातही कर्जाचा डोंगर वेगळाच. शिवाय कृषी विद्यापीठांमधून मिळणा-या निव्वळ पुस्तकी, `फिल्ड`च्या दृष्टीने केवळ निरूपयोगी-टाकाऊ आणि कळाहीन शिक्षणामुळे शेती करण्याविषयीच्या उदासीनतेमध्ये वाढच होते. या शिक्षणाचा प्रत्यक्ष शेती करण्यासाठी किती उपयोग होतो हाच मुळात संशोधनाचा विषय आहे. शिवाय या शिक्षणाचा व्यावहारिक उपयोग करून घेता यावा यासाठी विद्यार्थ्यांकडूनही प्रयत्न होताना दिसत नाहीत. कारण कृषी विद्यापीठात शिकायला येणारे 70-80 टक्के विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत (तेही बहुतकरून एमपीएससीच) यश मिळवण्याचा मार्ग म्हणूनच या पदव्यांकडं बघत असतात. आजपर्यंत एग्रिकॉसनी राज्याच्या प्रशाससेवेत दणदणीत यशाची एक परंपरा निर्माण केली आहे, हे खरंच आहे; पण हे एका अर्थानं `कृषी शिक्षण व्यवस्थे`चं अपयशच मानावं लागेल. कारण विद्यार्थ्यांना शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग करणं, स्वतःची शेती विकसित करणं, शेतीविषयक ब्रेक थ्रू संशोधन करणं याची प्रेरणा न मिळता या पदवीचा उपयोग करून सरकारी नोकर होण्यात जास्त रस वाटतो, हे या कचकड्याच्या पोकळ सिस्टिमचं खुजेपण अधोरेखित करणारी गोष्ट आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत, पण ते या सिस्टीमचे प्रॉडक्ट नाहीत तर त्यांनी जाणीवपूर्वक वेगळी वाट चोखाळल्यामुळे त्यांना अपवादात्मक भरारी घेता आली, हे विसरता कामा नये.

खरं तर आजच्या घडीला एग्रिकॉसच्या रूपात तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य असलेलं मनुष्यबळ शेतीक्षेत्रात आलं तर शेती-उत्पादनाचं चित्र वेगानं बदलू शकतं. काही एग्रिकॉसनी स्वतःच्या शेतीत आणि खासगी कंपन्यांमध्ये हे सिध्द करून दाखवलं आहे. सध्या आपल्याकडे `शेतीविषयीचा अभ्यास` या गोष्टीबद्दल प्रचंड उदासीनता असल्यामुळे ज्याला दुसरीकडं काही जमत नाही अशा लोकांच्याच गळ्यात शेतीचं लोढणं टाकलं जातं. त्यामुळं मोठा शेतकरी काय करतोय त्याचं अनुकरण करणा-या, खतं-औषधांच्या कंपन्यांच्या आणि कृषी सेवा केंद्रांच्या प्रचाराला बळी पडणा-या, शेतीपेक्षा गावगन्ना पुढा-यांच्या मागे फिरण्यता धन्यता मानणा-या किंवा स्वतःच पुढारपण करणा-या, पिढ्यानपिढ्या चालत आलेला ग्रामीण पारंपरिक शहाणपणा गुंडाळून ठेऊन स्वतःही अभ्यास न करता तसंच घोडं पुढं दामटणारा एक मोठा वर्गच आता शेतीधंद्यात दिसतो आहे. या पार्श्वभुमीवर शास्त्रशुध्द विचार करून आणि बदलत्या जगाचं-बाजारपेठेचं भान ठेऊन शेती करणा-या अनेक एग्रिकॉसनी आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. पण या विखुरलेल्या स्वरूपातल्या प्रयोगांना एक व्यापक परिमाण द्यायचं असेल तर शेतीविषयक धोरणांमध्ये बदल करण्यावाचून पर्याय नाही. आजपर्यंत एग्रिकॉसनी प्रशासन, राजकारण, वकिली, संरक्षण, बॅंकिंग, व्यवस्थापन आदी अनेक क्षेत्रांत व साता-समुद्रापलिकडेही कर्तृत्वाची मुद्रा उमटवून आपली क्षमता सिध्द केलीय. त्यामुळे शेतकरीविरोधी धोरणांत बदल केला, तर शेतीच्या क्षेत्रातही एग्रिकॉसना आपलं पाणी दाखवायची संधी मिळेल यात शंका नाही. पण त्यासाठी समाजानं आणि एग्रिकॉसनीही आपली मानसिकता बदलावी लागेल, हे ही तितकंच खरं.

(Agricos- कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारे, पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी) 


कबीर माणूसमारे

Mar 20, 2011

ब्लॉगवर स्वागत


नमस्कार,

ब्लॉगवर मनापासून स्वागत. व्यक्त होणं हीच हा ब्लॉग सुरू करण्यामागची प्रेरणा आहे. अनुभवांची कक्षा व्यापक करावी, जाणीवा समृद्ध व्हाव्यात आणि जगण्याविषयीचं एकूणच आकलन अधिक सखोल-सघन होत जावं ही आंतरिक इच्छा सतत तेवत असते मनात, त्यातूनच पांढ-यावर काळं करण्याची खाज स्वस्थ बसू देत नाही. ही आस तीव्र होत चालल्याने शेवटी हा खेळ मांडण्याशिवाय आम्हाला पर्याय उरला नाही!

शेती हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय. शेती आणि शेतकरी, त्यासंबंधीचे धोरणात्मक मुद्दे, समस्या या जोडीलाच शेती खात्यातल्या सुरस आणि चमत्कारिक घडामोडी आणि भ्रष्ट व्यवहारांचा पर्दाफाश हा सगळा पट पत्रकारितेच्या अंगाने कव्हर करण्याचा आमचा मनसुबा आहे.

आपल्या प्रतिक्रिया, सटीक टिप्पण्या, शेरेबाजी यांचं स्वागतच आहे.

कळावे,
     बीमाणूमारे
kabir.manusmare@gmail.com